लाखनी : लोकशाहीत कायद्याचे राज्य सर्वोच्च असताना, सावरी-मुरमाडी ग्रामपंचायत कार्यालयाला बेकायदेशीरपणे कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे प्रकरण आता नऊ जणांना चांगलेच महागात पडले आहे.
हेही वाचा : घरकुलाचा निधी कधी जमा होणार? लोकप्रतिनिधींचे मौन, गरिबांचे स्वप्न अधांतरी
गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने दोषी ठरवल्यानंतर, लाखनी पोलिसांनी सरपंच सचिन भिकाराम बागडे (वय ४५) यांच्यासह मंगेश धांडे (वय ३६), मोहन रेहपाडे (वय ४५), आदित्य बागडे (वय ३२), सुरेखा चाचेरे (वय ४५), पुष्पा वंजारी (वय ५५), विनोद चाचेरे (वय ४८), संजय वंजारी (वय ५६) आणि विनोद चकोले (वय ४५) सर्व रा. सावरी/मुरमाडी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२१, १८९(२) व १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विलंबानंतर अखेर कारवाईचा बडगा
काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय चौकशीचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या. ग्रामपंचायत अधिकारी संगीता वसंत मारवाडे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३५ वाजताच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बळजबरीने बाहेर काढले होते. त्यानंतर कार्यालयाला कुलूप लावून शासकीय कामकाज बंद पाडले होते. गटविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने या घटनेची सखोल चौकशी केली. या चौकशीत आरोपींनी केलेले कृत्य सिद्ध झाल्याचा निष्कर्ष निघताच पोलीस कारवाईचे आदेश देण्यात आले.
सत्तेच्या गुर्मीला कायद्याचा लगाम
लोकशाहीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित असताना, थेट शासकीय कार्यालयाला कुलूप लावण्याची ‘मुजोरी’ ग्रामपंचायत सावरी येथे घडली होती. प्रशासनाने घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमधील दबावाचे राजकारण करणाऱ्यांना चपराक बसली आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रतीक बोरकर करीत आहेत.

