>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
गौण खनिज माफिया बेफाम झाले असून, अनेक भागांत मोठ्या प्रमाणात मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू आहे. विशेष म्हणजे, महसूल प्रशासनाच्या अगदी जवळच हे प्रकार सर्रासपणे सुरू असल्यामुळे तहसीलदार कार्यालय गौण खनिज माफियांसाठीचा अड्डा बनले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन, तर काही ठिकाणी दिवसाढवळ्याही अवैध मुरुम उत्खनन केले जात आहे. बांधकामे आणि इतर कामांसाठी या मुरुमाची सर्रास विक्री होत आहे. तालुक्यातील अनेक भागांतील शेतजमिनी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुम काढला जात आहे. या अवैध धंद्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.
प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?
या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची आणि कारवाई करण्याची जबाबदारी तहसील कार्यालय आणि महसूल विभागाची आहे. मात्र, तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस आणि प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुम चोरी होत असताना प्रशासन गप्प का आहे? मुरुम चोरणारे आणि त्यांना अभय देणारे यांचा संबंध तपासला गेला पाहिजे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे की यात त्यांची मिलीभगत आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तालुक्यातील नागरिक करू लागले.
माफियांना राजकीय वरदहस्त?
या अवैध धंद्याला काही स्थानिक राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. राजकीय पाठबळामुळेच हे माफिया बिनधास्तपणे गौण खनिजाची चोरी करत आहेत आणि प्रशासकीय कारवाईपासून वाचत आहेत, असा आरोपही होत आहे. ज्या भागातून अवैध उत्खनन झाले आहे, त्या जागांची तत्काळ पाहणी करून पंचनामा करण्यात यावा.महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी.या अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन, लाखनी तालुक्यात सुरू असलेल्या गौण खनिज चोऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. अशी मागणी केली जात आहे.

