>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणूक सर्वार्थाने महत्त्वाची ठरणारी आहे. कारण, याच निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाला दिशा मिळणार आहे, नवे पायंडे स्वीकारले जातात की विरोध केला जातो, हे या निवडणुकीच्या निकालानंतर समोर येणार आहे.
हेही वाचा : भाऊ, लाइनीत लय हाय, विधानसभेची तिकीट कोणाले भेटन गा ?
यामुळेच गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलले, याचा आढावा महत्त्वाचा ठरतो.सण २०१९ ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचा जन्म, एकनाथ शिंदेंची बंडखोरी, देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी, अशा अनेक घडामोडी घडल्या.
युतीचे २०१९ मध्ये बिनसले
भाजप आणि शिवसेना युतीने २०१९ मध्ये विधानसभा लढवली. भाजपला १०५ जागांवर, तर शिवसेनेला ५८ जागांवर यश मिळाले, मात्र मुख्यमंत्रिपदावरून युतीचे बिनसले आणि शिवसेना युतीतून बाहेर पडली.
नवी आघाडी तयार
शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडल्यानंतर नवी समीकरणे निर्माण झाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निर्माण करीत सत्तास्थापनेचा प्रयत्न केला.
पहाटेचा शपथविधी
या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तास्थापनेचा दावा केला. राजभवनात फडणवीसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २३ नोव्हेंबर २०१९ चा हा पहाटेचा शपथविधी तेव्हा राज्यात खळबळ उडवून देणारा ठरला.
अजित पवार पुन्हा स्वगृही परतले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेला सत्तेचा प्रयोग हा ८० तासांत फसला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थातच स्वगृही परतले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांमध्ये राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला.
उद्धव ठाकरे झाले मुख्यमंत्री
अजित पवार स्वगृही परतल्यानंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वानुमते मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.
शिवसेना फुटली; शिंदेंचे बंड
महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांतच कोसळले आणि त्याला कारणीभूत ठरले ते एकनाथ शिंदे यांचे बंड. २०२२ मध्ये जून महिन्यात महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुका पार पडताच एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन सुरतला पोहोचले. त्यानंतर सुरतमार्गे ते गुवाहाटीला पोहोचले. एकनाथ शिंदे यांना ४० आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार पडले.
शिवसेनेचा नवा गट; शिंदे मुख्यमंत्री
शिंदे आमदारांसह मुंबईत परतल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. दिनांक ३० जून २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी शपथ घेतली. पुढे निवडणूक आयोगासमोरील याचिकेमध्ये आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली.
राष्ट्रवादीचा नवा गट
अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांनी २ जुलै २०२३ रोजी शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांनीही कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली.