>>>>जितेंद्र ढोरे | भंडारा चौफेर
लाखांदूर | मागील दोन दिवसांपुर्वी संततधार पडलेल्या पावसामुळे तालुक्यात भिषण पुर परिस्थिती निर्माण झाली असून, अस्मानी आणि सुलतानी संकटाने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांपुढे विघ्न अजूनही कायम आहेत.
यंदा तालुक्यात सलग तिसऱ्यांदा पुर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धान उत्पादक व बागायती शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, भक्तांचे विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता गणपतीचे गत सहा दिवसांपुर्वी आगमन झाले.
आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून गणेशभक्त पुढील चार दिवस बाप्पाच्या सेवेत असणार आहेत. माञ दुसरीकडे विघ्नहर्त्याच्या उत्सवात शेतकऱ्यांवर विघ्न निर्माण झाल्याने आता शेतकरी “विघ्नहर्त्या, शासनाला भरीव मदत देण्याची सद्बुद्धी देरे बाबा” असे साकडे घालत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात २५ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड केली होती. हंगामाच्या सुरवातीला तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आटापीता करीत मोठ्या जोमाने धान पिकाची लागवड केली. सुरवातीलाच धुवाधार पावसाने बँटींग केल्याने अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झालेले पिक वाहून गेले होते.
तर, काहींचे रोवणी अती पावसामुळे खोळंबली होती. त्यातच जूलै महिण्यात सलग दोनदा पुर परिस्थिती निर्माण होऊन, धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. जुलै महिण्यातील सलग दोनदा आलेल्या पुराखाली तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर धान पिक क्षेञ पाण्याखाली आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांचे कैवारी, लोकनेते, शेतकरी नेते म्हणून संबोधणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनी पुरग्रस्त भागाचे दौरे करून मदतीची मागणी केली.
अन् बाधित शेतकऱ्यांचे शेतांचे पंचनामे करण्यात आले. अशातच गत वर्षी आलेल्या पुराची नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे यावर्षीचा जूलै २०२४ महिण्यातील पुर ओसरताच मागिल वर्षाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती करण्यात आली.
दरम्यान यावर्षीच्या पुराचे नुकसान भरपाई मिळायचीच असतांना अचानक, गत दोन दिवसांपुर्वी तालुक्याला तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला, जूलै महिण्यात सलग दोनदा आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून खते व औषधांची फवारणी करून धान पिक जगविले होते. अशातच गत दोन दिवसांपुर्वी संततधार पडलेल्या पावसामुळे तालुक्यात तिसऱ्यांदा पुर परिस्थिती निर्माण होऊन सलग तिन दिवसांपासून धान पिक पाण्याखाली आले आहेत.
धान पिक बहरले व लोंबणीवर असतांना पिकाला बसलेल्या पुराच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करीत, तोंडातील घास हिरावला. ऐन गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवसापासून पुर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
गत सहा दिवसांपुर्वी पुराचा फटका बसल्यामुळे शेतातील पिक उद्ध्वस्त झाल्याने नैराश्यातून तालुक्यातील किन्ही/गुंजेपार गावातील गोविंदराव महादेव दानी (वय 67 वर्ष) या शेतकऱ्याने स्वता:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
जूलै व आँगस्त महिण्यापाठोपाठ गत दोन दिवसांपुर्वी संततधार पडलेल्या पावसामुळे तालुक्यात सलग तिसऱ्यांदा भिषण पुर परिस्थिती निर्माण होऊन, शेतकऱ्यांच्या ताठात जे शिल्लक राहील होत. ते देखील ऐन विघ्नहर्त्याच्या उत्सवात शेतकऱ्यांवर विघ्न ओढवल्याने “विघ्नहर्त्या, शासनाला भरीव मदत देण्याची सद्बुद्धी देरे बाबा” असे साकडे बाधित शेतकरी घालत आहेत.

