>>>>संदीप नंदनवार | भंडारा
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले. त्यात आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली. या निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत.
आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा करीत काहीजण प्रचारालाही लागले आहेत. पण, अजून महायुतीत कुणाच्या वाट्याला किती जागा येणार, त्यात कुणाला कोणत्या जागा मिळणार, हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे आपले तिकीट पक्के आहे, असा दावा करणाऱ्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानामुळे ब्रेक लागला.
कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी बैठकीत घेतील, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इच्छुक उमेदवार संभ्रमावस्थेत असले तरी साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात पुन्हा ‘हायहोल्टेज’ लढत व्हावी ही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
यातच ‘राहुल गांधी’शी घनिष्ठ संबंध असलेले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले काँग्रेसचे तर, राज्याच्या राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार ड़ॉ. परिणय फुके यांच्यातच ही लढाई व्हावी अशी चर्चा साकोली विधानसभा क्षेत्रात रंगू लागल्या आहेत.
पटोले व फुके यांच्यात लढत झाल्यास या लढतीचे राज्यस्तरावर पडसाद दिसतील, अशी स्थिती आहे. मात्र प्रत्यक्ष उमेदवार ठरेपर्यत या मतदारसंघात किती नाट्यमय राजकीय हालचाली पाहायला मिळतील, याचीही उत्सुकता असणार आहे.
साकोली विधानसभा मतदारसंघ १९८५ व २००९ च्या निवडणुकीमध्ये विशेष चर्चेत आला. सन १९८५ च्या निवडणुकीत भाजपाने निष्ठावंत गोविंद निंबेकर यांची तिकिट कापून मनोहर खेडीकर यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे जयंत कटकवार यांनी अपक्ष गोविंद निंबेकर यांचा निसटता पराभव केला होता.
विशेष म्हणजे, यावेळी निंबेकर यांचे निवडणुक चिन्ह घड्याळ होते तर, भाजपाच्या उमेदवाराची जमानत जप्त झाली होती. सन २००९ च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसमधून नाना पटोले यांना तिकिट दिले. पटोले भाजपाचे उमेदवार का झाले या मागची पार्श्वभुमी थोडी वेगळी आहे.
कारण, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पटोलेचा लाखांदूर मतदारसंघ गोठविण्यात आला. साकोली मतदारसंघात त्याचा समावेश करण्यात आला. साकोली मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश आहे.
त्यामुळे आपण आता आमदार होण्यासाठी कुठून निवडणुक लढवायची या विवंचनेत असलेल्या पटोले यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अस्त्र उगारत निवडणुकीपुर्वी झालेल्या नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर धानाच्या पेंढ्या जाळत काँग्रेसलाच रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला.
सण २००४ – २००९ या पाच वर्षाच्या काळात साकोली विधानसभेचे आमदार काँग्रेसचे सेवक वाघाये होते. वाघाये यांची तिकीट कापने शक्य नसल्यामुळेच पटोलेंनी पुन्हा मुंबई गाठण्यासाठी भाजपाच्या घरात प्रवेश केला असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी भाजपविरोधात बंड पुकारले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ ची लोकसभा निवडणूक नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला. नंतर ते २०१९ च्या साकोली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ही निवडणुक हाय होल्टेज ठरली.
नाना पटोले यांनी काँग्रेसच्या तिकीटावर ही विधानसभा निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात भाजपाने तत्कालीन पालकमंत्री परिणय फुके यांना तिकीट दिले होते. साकोलीतली ही लढत स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशी लढली गेली. परिणय फुके हे भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री असले तरी बाहेरचे तर नाना पटोले काँग्रेसचे हेवीवेट नेते आहेत अशी हवा त्यावेळी चालली.
तर पटोलेंनी प्रतिष्ठेचा मुद्दा करून काँग्रेस तिकीट घेतल्यावर विद्यमान आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली. मतदानाच्या दोन दिवस आधी फुके आणि पटोलेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने मतदारसंघात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत भाजपच्या परिणय फुकेंचा भाऊ तर काँग्रेसच्या पटोलेंचा पुतण्या गंभीर जखमी झाल्याचे जोरदार चर्चा त्यावेळी सुरु होती. या लढतीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपच्या परिणय फुके यांचा ६२४० मतांनी निसटता पराभव केला.
मुख्य समस्या
>भेल प्रकल्प अपूर्ण हजारो हेक्टर शेती
>अधिग्रहित वाढती बेरोजगारी
>सिंचनाचा अभाव -आरोग्य समस्या
साकोली मतदारसंघातील साकोली, लाखानी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांपैकी लाखांदूर हा नाना पटोलेंचा प्रभाव असणारा तालुका मानला जातो. या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असून उद्योगांचे फारसे अस्तित्त्व नाही.
मतदारसंघात एकूण लोकसंख्येपैकी ४८ टक्के मतदार हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था ही महत्वपूर्ण बाब मतदार संघाच्या दृष्टीकोनातून महत्वाची मानली जाते.राष्ट्रीय महामार्ग तसेच लगतच असलेल्या नागझिरा अभयारण्य पर्यटन क्षेत्र लागून असल्यामुळे सुरवातीच्या काळापासून वन्यप्रेमी आणि पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असते.
मात्र आज पर्यटन वाढले असले तरी स्थानिकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. तर याच तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ च्या कडेला युती सरकारच्या काळात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भेल प्रकल्प आणला. या प्रकल्पासाठी भूमिपूजन होऊन तसेच हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित केली. मात्र अजूनही प्रकल्प सुरु केला नाही. त्यामुळे अर्धवट पडलेला प्रकल्प कोण पूर्ण करणार आणि कोण रोजगार उपलब्ध करून देणार हा प्रश्न देखील आहे.

