चौफेर वार्ता मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली असून राज्यातील प्रचाराची धुरा ४ नेत्यांवर देण्यात आल्याच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी अतिशय मह्त्त्वाची आहे.
लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल पाहिल्यानंतर भाजपने कंबर कसली आहे. राज्यातील प्रचाराची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने मेगा प्लॅनिंग करण्यात आले आहे.
या माध्यमातून राज्यातील प्रचाराची जबाबदारी पक्षाच्या प्रमुख चार नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. या चार प्रमुख नेत्यांच्या अंगावर विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची जबाबदारी असणार आहे.
याच प्रमुख नेत्यांबरोबरच वीस नेत्यांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या समितीचे प्रमुख पद देखील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
तेच या समितीचे प्रमुख संयोजक असणार आहेत. त्यांच्यासोबत या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय रहाटकर, प्रवीण दरेकर, अतुल सावे, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश असेल.
ना. गडकरी यांच्यावर विशेष जबाबदारी विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपावण्यात आली आहे. गडकरी हे पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा घेण्याची रणनीती भाजपाच्या वतीने आखण्यात आली आहे. त्यामुळे आता गडकरी हे संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपाची चांगली पकड असलेल्या विदर्भात देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता. त्यामुळे आता भाजपाच्या वतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

