लाखनी : केसळवाडा/वाघ येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारे संचालित सैनिकी विद्यालयात १६ विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप, हगवण, उलटी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसून आल्याने त्यांना तात्काळ लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेतील अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
★६०० विद्यार्थ्यांच्या शाळेत स्वच्छतेचा प्रश्न
भंडारा जिल्ह्यात नावाजलेली ही शैक्षणिक संस्था असून, येथे इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत निवास आणि शिक्षणाची सोय असली तरी परिसरातील आणि वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे हा संसर्ग पसरल्याची जोरदार चर्चा नागरिकांत आहे. मागील वर्षीही या शाळेत एका विद्यार्थ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता, ज्यामुळे शाळा व्यवस्थापनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर टीका झाली होती. आता पुन्हा अस्वच्छतेमुळे उद्भवलेल्या या घटनेने पालक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
★रुग्णालयात उपचार सुरू, उर्वरित विद्यार्थ्यांचीही तपासणी
सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नक्ष अमोल कांबळे (१४), कृष्णा विलास सिडाम (१४), वेदांत घोडमारे (१४), अथर्व सतीश मेश्राम (१५), विराट विश्वेश्वर दराव (१५), मयंक रमेश उईके (१४), तनिष सुरेश मळकाम (१२), स्वप्ननंद संजय नागदेवे (१४), अर्णव गजेंद्र राऊत (१४), आर्यन टीकाराम राऊत (१४), दशमेश सुरेंद्र चौधरी (१३), रजत गोपीचंद ढोणे (१६), कल्पेश कैलास तुमसरे (१४), अमन जतिष कुंभारे (१३), श्रेयश संजय डडमल (१४) आणि सोहन सुधाकर नेवारे (१४) यांचा समावेश आहे. याशिवाय, इतर काही विद्यार्थ्यांमध्येही सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
★शाळा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
शाळा व्यवस्थापनाने तात्काळ पावले उचलत प्रभावित विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले असले तरी, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. “शाळेत स्वच्छतेची कायमच कमतरता आहे. यामुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनीही शाळा प्रशासनाने परिसर आणि वसतिगृह स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेने शाळेतील आरोग्य आणि सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापनाने स्वच्छता मोहीम हाती घेणे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाची चौकशी आणि जबाबदारी निश्चितीची मागणी जोर धरू लागली आहे.
सैनिकी विद्यालयात १६ विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण
स्वच्छता अभावाचे कारण?

